चारोळी
- Aarti Manjarekar
- Nov 3, 2022
- 1 min read
Updated: Nov 16, 2022
#
म्हणे जन्म आणि मृत्यू
माणसाच्या हातात नसतं
हा भ्रम नाही तर काय?
जणू मधलं अंतर असतं !!
#
आयुष्यच क्षणभंगुर
तिथे सुख कसं चिरंतन मिळावं
पण म्हणून का चितेवर जळण्या-
आधीच चिंतेत जळावं?
#
एकवेळ बाजी विस्कटली
तर डाव का उधळायचा
हुकलेला डाव देवाचा,
पुढचा निगुतीनं खेळायचा
#
नियतीने सोडलेल्या
रिकाम्या जागा भरत रहायचं
मन सुखाच्या शिंतोड्यांमधे
अगदी चिंब भिजवायचं
#
आपल्यापाशी असलेले आयुष्य
जिवापाड जपायचे
पण विश्वस्ताने
अनामत ठेवीत मन नाही गुंतवायचे
#
दानयज्ञ संपन्न झाला
कोशागारच नव्हे मनही रिते झाले
भरली होती तरीही ओंजळ
पीडितांच्या आशीर्वादांनी…
#
प्रत्येक कुरूप बदकाने
राजहंसच का असायला हवं
बहुतेक त्याला आहे तसं स्वीकारणं
‘शहाण्यांना’ जमत नसावं
#
वेदनेने तडफडणारं पोटचं पोर पाहून
त्या दगडाला पाझर फुटत नव्हतां.
कुणा कुडमुड्याच्या सांगण्यावरून ग्रहशांती करून
तो नुकताच ‘कृतकृत्य’ झाला होतां.
#
पार्थिव जळून कधीचं राख झालं होतं
पण अजूनही …
भावना, इच्छा, आकांक्षांचं कलेवर
चार खांद्यांची वाट पहात होतं.
#
‘आताशा कसलेच स्मरण रहात नाही’
म्हातारी खेदाने म्हणाली.
मला तिचा हेवा वाटला.
तिला विस्मरणाचे वरदान मिळाले होते.
आरती मांजरेकर
३ नोव्हेंबर २०२२

Superb......khup ch